रविवार 26 फेब्रुवारी 2012

मंडळे आणि विकास



प्रिय मैत्रणी,

ब-याच दिवसांनी पत्र लिहितोय. राग नसावा. लोभच असावा. काय आहे थोडं वेगळं लिहायचं होतं ना म्हणून....

कोकण म्हटलं की आठवते ती निसर्गाने नटलेली परशुरामाची भूमी. हिरव्यागार शालूने ल्यालेली भूमी. कोकणावर निसर्गाने मुक्तपणे सर्व रंगांची उधळण केली आहे. नारळी-फोफळीच्या बागांबरोबरच आता हापूसच्या बागाही दिसू लागल्या आहेत. प्रेमाने ओथंबलेला कोकणी माणूस हे कोकणाचे आणखी एक वैशिष्ट्य. पण कोकणचा हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे कोकणात अनेक गावांमध्ये, वाड्यांमध्ये मंडळे स्थापन झाली आहेत. तस...ेच विविध समाजाची वेगळी अशी मंडळेही आहेत. ही मंडळे आपापल्या परीने गावाचा विकास करण्यास हातभार लावत असतात. अनेक वेळा राजकीय मदतीनेही गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.

गाव तेथे मंडळ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रत्येक गावाच्या मंडळाची खास अशी परंपरा, वैशिष्ट्ये असतात. अजूनही काही गावांमध्ये नवीन मंडळांची स्थापना होते तर काही मंडळांची पुनर्स्थापना होते. तसेच बहुतांशी गावांमध्ये मुंबई आणि ग्रामीण मंडळ अशी दोन मंडळे कार्यरत असतात. संस्कृती, परंपरा जोपासल्या जातात. सरकारी योजना राबवून गावाचा विकास साधला जातो. मंडळांचा एकूण विचार करता काही मंडळे यशस्वी झालेली दिसतात तर काही मंडळे अपयशी ठरलेली दिसतात. काही मंडळांमध्ये वाद-विवाद होतात आणि ही मंडळे पुढे अडचणीत येतात. काही मंडळे उभारणी आधीच कोलमडत असतात. त्यामुळे काही गावांमध्ये विकासाची गंगा वाहतेय तर काही गावांमध्ये विकास हा कोसो दूर आहे.

काही गावांमधील मंडळे कमालीची यशस्वी झालेली आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत. अशा मंडळांची बांधणी ही मजबूत अशा वैचारिक पायावर झालेली असते. अशा मंडळाच्या सभासदांमध्ये गावाप्रती विकासाचा ध्यास असतो. विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता, एखाद्या निर्णयाचा पाठपुरावा करण्याचे अथक आणि प्रामाणिक प्रयत्न असतात. सर्वांना एकत्र घेऊन आणि हातात हात घालून काम करण्याची सचोटी आणि चिकाटी दिसून येते. निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात, अशा निंदकांना आणि विरोधकांनाही ते पुरून उरतात. त्याच्या विरोधाला उत्कृष्ट कामांनी आणि एकजुटीने ठेचून काढतात. काळाची पावले जाणून जी मंडळे वाटचाल करतात तिच मंडळे भविष्यात यशस्वी होतात. अनेक ऐतिहासिक निर्णयाचे ही मंडळे साक्षीदार ठरतात. म्हणूनच नावलौकिकाला, नावारुपाला येतात. काही मंडळे पारंपरिक, धार्मिक चालीरीतींमध्ये काळानुरूप, परिस्थितीनुरूप बदल करतात. ते बदल करणे हे ख-या अर्थाने काळसंग आणि सुसंगत असते. गावातील चाली, रुढी, परंपरा यांचा विचार करता त्यात बदल करताना अथवा काही गोष्टींना नाकारताना मंडळांना रोषाला, चुकीच्या प्रतिवादाला सामोरे जावे लागते. पण जे कार्यकर्ते विकासाच्या, प्रगतीच्या ध्यासाने झपाटलेले असतात ते कोणताही धोका पत्करायला तयार असतात. नाऊमेद न होता सातत्याने नवनवीन विचारांचा, दृष्टिकोनांचा, कल्पनांचा योग्य रीतीने आणि खुबीने वापर करताना दिसतात. सकारात्मक विचार करून पुन्हा नव्या जोमाने आणि उत्साहाने कामाला लागतात. अशा वेळी संपूर्ण गावही त्यांच्या मागे असतो. मुंबई मंडळ आणि ग्रामीण मंडळ हातात हात घालून चालतात तेव्हा गावाच्या विकासाचा गाडा चालतोच, एवढेच नव्हे तर तो धावतो. अशा वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे श्रम तसेच घेतलेले परिश्रम यशात परावर्तित होतात. आणि एका यशस्वी मंडळासहीत विकसित गावाचे स्वप्न साकार होते.

कधी कधी याच्या उलट घडताना दिसते. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने मंडळाची स्थापना करतात. परंतु काही दिवसांतच त्यांच्यामध्ये मतभेद होताना दिसतात. कोणत्याही मंडळाने चाकोरीबाहेरील, चौकटीबाहेरील विचार मांडले की प्रथम विरोध होतो तो सनातन विचार करणा-या ग्रामस्थांचा. ज्यांना ठरवून दिलेल्या चौकटीबाहेर विचार करायचा नसतो. त्यांना रुढी, परंपरा आणि धार्मिकता यांना चिकटून राहायचे असते. मुळात रुढी, परंपरा, चालीरीती आणि संस्कृती यांच्यातील वेगळेपणा, फरक कळत नाही तेथेच गाडी अडते. तेथूनच मग वैचारिक गोंधळाला सुरुवात होते. आधुनिक, वैज्ञानिक विचार आणि पारंपरिक, रुढीवादी, धार्मिक, श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्यावर आधारित विचार असलेल्या सभासदांमध्ये मतभेद होतात. त्यामुळे संघर्ष वाढतो आणि एखादे उभारते मंडळ बरखास्तीचा विचार करते. अशा वेळी त्या गावाची अवस्था ये रे माझ्या मागल्यासारखीच झालेली दिसते. त्यातच प्रत्येक जण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. अनेक स्वार्थी लोकांना गावावर एकछत्री अमल हवा असतो. त्यांचे फावते आणि ते गावात एकी नसल्याचा फायदा उठवतात. हे लोक गावातील लोकांना अडल्यानडल्या प्रसंगी मदतीचा हात देतात. काही जण आपलं स्थान आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. नि:स्वार्थीपणे काम करणारे सोडले तर ब-याच वेळा दयेचा आवळा देऊन कोवळाच काढला जातो. सर्वसामान्य माणसाच्या हे लगेच लक्षात येत नाही. कारण त्यांच्या अडचणींच्या वेळी मदत मिळाली यातच ते धन्यता मानतात. मग एखाद्या मंडळापेक्षा ठरावीक व्यक्ती वरचढ होते आणि मंडळाचे महत्त्व आपोआपच कमी होते. ही गोष्ट अनेक मंडळांना डोकेदुखी ठरते. याचाच फायदा घेऊन मंडळाचे अनेक नियम धाब्यावर बसविले जातात. मग सभासद अमुक एका व्यक्तीचे तुम्ही मंडळाने काय केलेत तर माझे मंडळ काय करणार ? अशी हक्काची आणि गुर्मीची भाषा करतात. शेवटी मंडळ हे मंडळ राहते आणि गाव पुन्हा होता तसाच राहतो. कारण मंडळाची सकारात्मक विचारांची आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता कमीच असते. एखादी स्वार्थी व्यक्ती जितक्या तत्परतेने असह्य माणसाला मदत करते तितक्या तत्परतेने मंडळ मदत करेलच याची शाश्वती नसते.

तसेच काही मंडळांमध्ये अंतर्गत वाद असतात किंवा अंतर्गत वाद निर्माण केले जातात. मंडळात राहून मंडळातील कच्चे दुवे पाहून मंडळात वाद कोळशासारखे पेटवीत ठेवले जातात. मंडळात राहून मंडळाचे खच्चीकरण करण्यात धन्यता वाटत असते अशा लोकांना. म्हणजे त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळे ब-याच वेळा मंडळातील सभासद अशा कारभाराला कंटाळून, वैतागून मंडळाला सोडून जातात किंवा मंडळात बसण्याचे टाळतात. आणि मंडळाची वाताहतीकडे वाटचाल सुरू होते.

अनेक ठिकाणी मंडळे दात्यात भरडली जातात. एकाच गावात दोन-तीन दिग्गजांना किंवा श्रीमंत व्यक्तींमध्ये वाद असतात. ते एकमेकांना पाण्यात पाहत असतात. अशा वेळी कोणत्या तरी एका व्यक्तीच्या हातात गावाची नस असावी असे त्याला वाटत राहते. तर दुस-या व्यक्तीला गाव आपल्या ताब्यात असावा असेही वाटते. त्यामुळे मंडळ स्वत:साठी कसे वापरता येईल याचा विचार सुरू होतो. मंडळ सक्षम नसेल किंवा छोटे असेल तर काही दिवसांतच मंडळाला त्यांचासमोर हात टेकण्याची वेळ येऊन ठेपते.

कोकणातील अनेक मंडळांत वाद होतो तो म्हणजे मुंबई मंडळ आणि ग्रामीण मंडळ यांच्यात. एकाच गावातील या दोन मंडळांमध्ये अनेक गोष्टींवरून वाद-विवाद होताना दिसतात. त्यात अधिक वाद होतात ते धार्मिकबाबी, परंपरा आणि रुढींशी संबंधित असतात. जगाने २१ वे शतक ओलांडले तरी कोकणात रुढी, परंपरा आणि धार्मिक बाबींचा पगडा तितकासा कमी झालेला नाही. तसेच ग्रामीण मंडळे नवीन विचारांचा स्वीकार करतीलच असेही नाही. आधुनिकता आणि पारंपरिकता यांच्यात सांगड घालून चालणे अतिशय अवघड बनते आणि मग पुन्हा खटके उडायला सुरुवात होते. होळी-शिमगा या सणांवरून तर अनेक मंडळांमध्ये तेड निर्माण होताना दिसते. त्यातून अनेक अनावश्यक गोष्टींवर अकांडतांडव निर्माण केले जाते आणि विकासाचा मुद्दा बाजूला राहतो. आपापसातील वैचारिक भांडणे नंतर हातघाईवर येतात, कारण वैचारिक गुलामगिरीतून कोकणी माणूस पाहिजे तेवढा बाहेर पडलेला नाही.

एकूणच काय तर कोणत्याही मंडळाने नवविचारांचा, सणांतील व्यावहारिकतेचा, श्रद्धा-अंधश्रद्धेचा, रुढी-परंपरा, आर्थिक बाबींचा तसेच राजकीय, सामाजिक धोरणांचा विचार करायला हवा. काही लोकांच्या हितासाठी, त्यातच स्वार्थासाठी मंडळे न चालविता आपल्या घरासहीत गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याच्याकडे मंडळांनी परिपूर्ण लक्ष दिले पाहिजे तरच मंडळे टिकतील आणि गावाचा विकास होईल. अंधश्रद्धेच्या चुलीवर भाक-या न भाजता विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक निकषांवर मंडळांनी भाकरी भाजली पाहिजे. यातच ख-या अर्थाने यश सामावलेले आहे.


तुझाच मंडळासाठी झटणारा,

प्रेयस

रविवार 1 जानेवारी 2012

माझा नवा संकल्प

प्रिय मैत्रणी
गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! मैत्रणी, नव्या वर्षाचा नवा संकल्प आखलास की नाही ? आखलाससुद्धा. वा. ग्रेटच ! काय म्हणतेस, मी संकल्प आखला का ? तुला खरं सांगू का... मी दरवर्षी संकल्प करतो ना तो मुळी मोडण्यासाठी. हसतेस काय... मी जेवढे म्हणून संकल्प आखले ना त्या सर्व संकल्पांनी अर्ध्यावरच डाव मोडला आणि संकल्पांची कहाणी अधुरी राहिली. तरीही मी या वर्षी नवा संकल्प केलाय. कोणता काय विचारतेस ? 'भ्रष्टाचारमुक्त मी'. आता भ्रष्टाचारमुक्त मी असं नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना. वाटणारच. कारण माझ्या संकल्पाची संकल्पानाच भारी आहे. आणि हे बघ ना की ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी उपोषण केलं. पण काय झालं ते ठाऊक आहे ना. लोकपालचं जोकपाल झालं असं नाही वाटत तुला ? लोकशाहीच्या चौथ्या खांबाने संपूर्ण दिली आणि दाखविली की... खरं पाहता, लोकपालसाठीचे आंदोलन यशस्वी झालं नाही, याची बोच मनाला टोचत राहणार... तेव्हा भारत देश भ्रष्टाचारमुक्त होईल तेव्हा होईल, पण मला स्वत:ला भ्रष्टाचारमुक्त होता येतं का ते पाहायचंय. म्हणजे प्रत्येक जण भ्रष्टाचारमुक्त होऊ शकला तर कालांतराने देश भ्रष्टाचारमुक्त नाही का होणार ? मैत्रणी, पुढच्या ೨೦೧೩ मध्ये माझ्या या संकल्पाचे तीनतेरा वाजणार नाहीत याची काळजी मला घ्यायचीय. तेव्हा तूही सामील हो माझ्या या संकल्पात. कारण थोड्या दिवसांनी किंवा वर्षांनी या संकल्पाचे नाव बदलेल... आणि त्याचं नवं नाव होईल 'भ्रष्टाचारमुक्त आपण.'

तुझाच नवसंकल्प मांडणारा आणि मोडणारा,
प्रेयस

बुधवार 14 डिसेंबर 2011

पालकपर्व - एक अभियान

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग, कसं काय चाललंय? अरे वा, तू तर आज खूपच खुशीत दिसतेस. म्हणजे अभिज्ञान अकादमीला भेट दिल्यानंतर नवचैतन्य संचारलं वाटतं. बरं, त्या दिवशी अकादमीबाबत सांगता सांगता मी एवढा भारावून गेलो म्हणून सांगू... त्या भारावलेपणात एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. तुझी उत्कंठा वाढली ना! सांगतो. अभिज्ञान अकादमी सर्वांसाठी सर्वांगसुंदर असं 'पालकपर्व' नियतकालिक प्रकाशित करणार आहे. हे ऐकून आनंदाच्या उकळ्या फुटल्या ना...ऐकू येतायत मला. आता पालकपर्वमध्ये काय काय असेल ते विचारू नकोस. जे जे पालकांना हवं ते ते सर्व काही.
आपल्या या पालकपर्वमध्ये अथपासून इथपर्यंत सर्वच असणार आहे. शिक्षणव्यवस्था, परीक्षापद्धती, स्पर्धा, करिअर, विवाहबंध, मातृत्व आणि पितृत्व, नातेसंबंध, सामाजिक भान, स्नेहबंध, सेवाभाव, कार्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकसंस्था, साहित्य, संस्कृती, कलाविष्कार, नवता, ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान, अभिज्ञान, आचार-विचार, उच्चार, विहार, वेळ, नियोजन कौशल्य, व्यवस्थापन, घर, शाळा, परिसर, समाज अशा वैविध्यपूर्ण विषयांनी पालकपर्व सजलेला, नटलेला, आकर्षक, देखणा आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल.
एवढंच नव्हे तर पालकपर्वमधून मूलभूत रचनावादी शिक्षणासाठी विधायक भूमिकाही मांडली जाणार आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रीय मांडणी केली जाणार आहे. पाल्याचा अभ्यास, वर्तन आणि करिअरच्या तंत्राचाही समावेश असणार आहे. सुजाण पालकत्वासाठी नवा विचार आणि योग्य दृष्टिकोन मांडला जाणार आहे.
चोखंदळ, चिकित्सक आणि चौकस वाचनासाठी साक्षेपी, सर्जनशील आणि सरस लेखनासाठी, विचार, भूमिका आणि सैद्धांतिक संपादनासाठी, अर्थपूर्ण, कल्पक आणि आशयगर्भ कलानिर्देशनासाठी दर्जेदार आणि संग्राह्य असा पालकपर्व असेल. ललित-वैचारिक जीवनाविषयीचा 'मूलमंत्र' देणारं नियतकालिक म्हणजे 'पालकपर्व.' अगं, म्हणूनच तर अशा लाडक्या, देखण्या, दर्जेदार, चोखंदळ नियतकालिकाचं नाव ठेवलंय 'पालकपर्व.'
मैत्रणी ऐकलंस ना हे सारं... मग आता तू तुझ्या मित्र-मैत्रिणींना पालकपर्वविषयी प्रेमानं सांग आणि त्यांना सभासद बनविण्याचा सपाटा लाव.

तुझाच सभासदांसाठी झपाटलेला,
प्रेयस

रविवार 4 डिसेंबर 2011

मित्र असावा तर असा

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग. अरेच्या आज लवकर जाग आली वाटतं. फारच छान. म्हणजे मी रोज तुला मित्रत्वाच्या नात्याने फोन करतो याचा चांगला परिणाम झाला तर. अगं, मित्र असावा तर असा आणि मित्रत्व असावं तर आपल्यासारखं. मैत्रीवरून आठवलं बघ. काय आठवलं अस तू विचारणारच. शोलेमधलं ते सुंदर गीत तुला माहीत आहे का? कोणतं काय विचारतेस? चल तर सांगूनच टाकतो तुला. यह दोस्ती हम नही छोडेंगे... किती गहिरं नातं असत ना मित्रत्वाला. अगदी तुझं नि माझं आहे तसं. तुला तर मित्र म्हणजे आरसाच वाटतो. बरोबर ना. आपण कसे आहोत, हे मित्रच चांगलं सांगू शकतात. धडाकेबाज सिनेमा पाहिलास का तू... चक्क पाहिलास.. मग गाणं एकलं असशील. तसं नाही, काही जणांना सवय असते ना गाणं लागल्यावर डुलकी काढायची. अगदी अधिवेशनावेळी नेतेमंडळी काढतात तशी. जाऊ दे. आपण मैत्रीबद्दल बोलत होतो. हा, तर काय ही दोस्ती तुटायची नाय.. मला मैत्री सांगायचीय ती त्या साहेब आणि राव यांच्यातील. आता हे साहेब आणि राव कोण म्हणून विचारलंस ना तर महाराष्ट्राचा अधिवासी दाखला रद्द करून टाकायला सांगेन. अगं, मैत्री असावी तर बाळासाहेब आणि पवारांसारखी. निरागस, निखल आणि दूरदृष्टी असणारी बरं का. महाराष्ट्राचे हे दोन दिग्गज. काय मित्रत्व जपतात म्हणून सांगू. शिकलं पाहिजे आपण. राजकीय पटलावर एकमेकांचे घोडे मारलेत पण मैत्रीच्या पटलावर मात्र राजाप्रमाणे मित्रत्व जपलंय. सो ग्रेट. साहेबांकडून काही प्रसंग निर्माण झाला किंवा साहेबांवर काही प्रसंग पडला की रावसाहेब प्रेमाने येतात भेटायला मातोश्रीवर. अगं परवाचंच बघ ना. संपूर्ण महाराष्ट्र समस्याग्रस्त आहे यावर जेवढा एकोपा नेत्यांनी केला नाही तेवढा एकोपा पवारसाहेबांना मारल्यानंतर झाला. माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे. निदान महाराष्ट्र एक होऊ शकतो याची अन्य राज्यांना खात्री पटली. शरद पवारांसारखा दूरदृष्टी लाभलेला नेता महाराष्ट्राला लाभलाय. म्हणून पवारांच्या पडली तेव्हा सर्वांना चिडीने जाग आली. आणि साहेबांनी रावांची बाजू घेतली. अगदी एखाद्या जीवलग मित्रानं घ्यावी तशी. मित्र असावा तर असा. अशी राजकीय पटलापलीकडील जपलेली मैत्री विरळाच. तेव्हा मी काय म्हणतो, आपण सलाम करूया त्यांच्या मित्रत्वाला आणि आपली मैत्री मात्र घट्ट करूया.

तुझाच मैत्री जपणारा,
प्रेयस

शुक्रवार 2 डिसेंबर 2011

माझं दुसरं घर

प्रिय मैत्रणी,
गुड इव्हिनिंग, अगं आज म्हटलं गुड इव्हिनिंग करूया... वीकेण्ड असला की अनेक जण वीकेण्डला जाण्याचे बेत आखतात... पण तुला सांगू का, मी आता वीकेण्डला माझ्या दुस-या घरी जाण्याचं ठरवलंय... आता दुसरं घर कुठलं ही उत्सुकता लागली असेलच... असो... अशी रागावू नकोस... बरं तर माझ्या दुस-या घराचा पत्ता आहे... मुंबई, डॉक्टर आंबेडकर रोड, रंगारी बदक चाळीतील अभिज्ञान अकादमी... माझ्या या दुस-या घराचं घरपण सांभाळतायंत माझे प्रिय गुरूवर्य, मित्रवर्य प्राध्यापक विजय जामसंडेकर... अभिज्ञान अकादमी ही माणसाला प्रेमपण देणारी एकमेव संस्था आहे... काय देत नाही हे घर मला... सर्वच देतं अगदी अथपासून इथपर्यंत... मी जो काही तुझ्यासमोर आहे ना ती या घराची देणगी आहे... जो जे वांछिल ते... असं माझं हे घर... या घरानं अनेक विद्यार्थ्यांना केवळ उभंच केलं नाही तर त्यांचं आयुष्य घडवलंय... अनेकांना मरणाच्या वाटेवरून नवजीवन दिलंय... अनेकांचे उदध्वस्त संसार फुलवलेत... तर मोडणा-या संसारांना प्रेमाने, विचारांनी, जगण्याच्या दृष्टिकोनानं उभारी दिलीय... अशा माझ्या घराचा असा मोठा परिवार...रमायला आवडतं अशा या परिवारात... मनसोक्त आनंद लुटल्याचा क्षण काही औरच असतो, बघ...
माझं हे संस्थारूपी घर जगावेगळं शैक्षणिक कार्य करतंय...अगदी प्रवाहाच्या विरोधात जाऊन... आजच्या तकलादू आणि खर्चिक शिक्षणपद्धतीमुळे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझं घर आधारवड ठरलंय... आणि अजून ठरत आहे... इतकंच नव्हे तर ते अनेकांना अगदी माझ्यासारख्यांना जणू आपलं हक्काचं दुसरं घरच वाटंत... ज्योत से ज्योत.... म्हणतात ना तेच कार्य माझं घरकुल करतंय... गेली अनेक वर्षांपासून आणि तेही अगदी मनापासून...या घरकुलानं शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील अनेकांचं जीवन प्रकाशासारखं लख्ख उजळून टाकलंय... आता तू म्हणशील हे कसं काय शक्य आहे, तुला प्रश्न पडणं साहजिकच आहे...माझं घर म्हणजे अभिज्ञान अकादमी सातत्यानं नव्या रचनावादी शिक्षणासाठी विधायक भूमिका मांडतेय... आजच्या बदलत्या जीवनमूल्यांच्या काळात पालकांना मुलांच्या जडणघडणीत जीवन-शिक्षणविषयक समुपदेशन करतेय...एवढंच नव्हे तर विविध शैक्षणिक उपक्रमांची शासन, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था, शिक्षणप्रेमी आणि माध्यमांनी दखल घेतलीय... आहे की नाही दम... आणि हो खास गोष्ट सांगायची राहूनच गेली....कोणती असं काय विचारतेस... अकादमीने प्रकाशित केलेल्या विशेषांकांना एक नव्हे-दोन नव्हे तर तब्बल अठरा पुरस्कार प्राप्त झालेत... आहे ना अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट... गोष्ट असावी तर अभिज्ञान अकादमीसारखी स्वच्छ आणि स्पष्ट...
माझ्या या अकादमीत बौद्धिक चर्चा झडतात... आधुनिक आणि वैचारिक दृष्टिकोन दिला जातो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे जीवन घडवलं जातं.... त्यामुळे येथे पाखरांनो परत फिरा असं म्हणावं लागत नाही तर पाखरंच घरट्याकडे म्हणजे अभिज्ञान अकादमीकडे परततात...मनसोक्त बागडण्यासाठी...वैचारिक देवाण-घेवाण करण्यासाठी...मदतीचा हात पुढे करण्यासाठी...आता तूही चल माझ्याबरोबर... कारण घराला प्रेमपण देणारी माणसं घडवतंय हे माझं घरकुल...त्या घरकुलात प्रत्येकाचं स्वागतच होतं... आज तुझंही होईल तेवढ्याच प्रेमानं जेवढं माझं काही वर्षांपूर्वी झालं होतं... चलं, आता बोलण्यात वेळ घालवू नकोस...वाट पाहतंय माझं दुसरं घर...

तुझाच घरकुलवेडा,
प्रेयस

रविवार 27 नोव्हेंबर 2011

चल, बेगीनं नाट्यसंमेलनाला...

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग, अगं, एक आनंदाची बातमी सांगायचीय तुला... सांगावीच लागणार... तुला वर्तमानपत्रं वाचायला नकोत अन् न्यूज पाहायला नकोत... पुस्तकं वाचतेस हेच मोठं नशीब... अशी आवासून पाहू नकोस... तयारीला लाग आदी... बॅग भर... अगं, कुठून पळून जायचंय नाही... मग, कुठं जायचा असा प्रश्न पडला असेल ना तुला... सांगतो हं... हे बघ आपल्याला ना सांगलीत जायचंय, सांगलीत... सांगलीत, असा प्रश्नार्थक चेहरा करू नकोस... सांगलीत ९२ वं नाट्यसंमेलन भरणार आहे ना... त्यासाठी जायचंय... २२ आणि २३ जानेवारीला... आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची निवड झालीय... झक्कास... आपल्याला वर्षे नाही ना झालीत एवढी नाट्यसंमलनं झालीत... सांगलीच्या संमेलनात वादावादी न करता तुला भेटायला आवडेल मला... कदाचित एकादी कविता नाहीतर चारोळी तरी सुचेल तुझ्यावरून... तेवढीच सादर करू... हे बघ, साहित्यिक-पत्रकार-राजकारणी वाद असायचे तर असू दे...तुझ्या अन् माझ्यात मात्र वाद नको...कळंल का... अन् हो स्वागताला डॉक्टर आहेतच की... म्हणजे काय म्हणजे...तुला प्रत्येक गोष्ट आता भरवायला लावू नकोस हं... अगं, डॉक्टर पतंगराव कदम आहेत स्वागताला... तसेच अनेक थोरामोठ्या साहित्यिकांच्या गाठीभेटी होतीलच की... थोर नाटककार, कलावंत, रंगकर्मी अन् कोण कोण भेटतील म्हणू सांगू... ते जाऊ दे...प्रत्यक्षच पाहू...मोघेंना तर सासूरवाशिणीला माहेरी आल्यानंतर होणा-या आनंदाची अनुभूती आलीय म्हणे... असू दे... त्यांच्या आनंदात आपला आनंदही साजरा करू...इकडे मुंबईत म्हणे जयवंत परबांना शिवसेनागृही परतल्यानंतर तसली अनुभूती आलीय... शेवटी माहेरपणाचा थाट काही मोठा आणि औरच... तू अशी बेळगाववाशी अन् मी मुंबईकर... दोघांनी मिळून आता सांगलीकर होऊया... कशी वाटली कल्पना... हा पण तुला सारखंसारखं राजकारण्यांसारखं स्वगृही नाही हा जाता येणार... चल, मी निघालो....कुठे काय विचारतेस... सांगलीचं तिकीट बुक करून येतो...नंतर बसू बोलत दोघं -जण नाट्यनिर्मितीपासून नाट्यसमीक्षेपर्यंत...
तुझाच संमेलनवेडा,
प्रेयस

गुरुवार 24 नोव्हेंबर 2011

ती वीज तुझ्या नजरेमधली...

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग... अगं अजून डोळे काय झाकून आहेस... सूर्य महाराजांचं केव्हाच आगमन झालंय माथ्यावर अन तू म्हणतेस डोळे चुरचुरतायंत... कॉलेजलाही तू अशीच डोळे मिचमिचवीत असायचीस... अगदी झोपेतनं उठल्यासारखी... पण काहीही म्हण तुझी नजर मात्र सॉलिड भेदक होती... तुझी ती नजर पाहिली ना की कशाची उपमा देऊ हा माझ्या नजरेला प्रश्न पडायचा... असं वाटायचं की, शोएब अख्तरचा नो बॉलही एवढा वेगात येत नसेल... तुझी ती भेदक नजर संपूर्ण क्लासवर भरभरली की क्लास प्रकाशमान वाटायचा... माहीत आहे ना मराठीचे प्राध्यापक काय म्हणायचे ते... मुली अशा जागा पकडतात की एका नजरेत ३६० चा अँगल असतो... ते जाऊ दे... हे मात्र खरं की त्या नजरेनं माझी विकेट घेतली...आय मीन मला बोल्ड केलं... तुझ्या त्या सुंदर नजरेचे कांगोरे मला नेहमीच हवेहवेसे वाटायचे... तुझे ते नयन पाहिले की एश्वर्या रायच्या डोळ्यांचं सौंदर्यही खुजं वाटायचं... आठवतं तुला... तू कॉलेजच्या बागेत फिरत होतीस... आणि मी असा चाफा बोले ना सारखा पांढ-या चाफ्याच्या मुदात एकलव्यासारखा बसून होतो... फूलझाडागणिक आणि चेह-यावरील हास्यागणिक बदलणारी तुझी नजर मला घायाल करायची... एकदा तर तुझ्या नजरेनं माझं हृद्य इतकं घायाल झालं की दिलाच्या आकाराचे तुकडे सांभाळताना नाकीनऊ आले माझ्या... तुझं ते डोक्याला हात लावून तिरक्या नजरेनं पाहणं... गार्डनमध्ये बसल्यावर मान वळवून पाहणं... चौपाटीवर फिरताना वा-याच्या लकेरीअगोदर तुझ्या डोळ्याची पापणी लवणं... अन् निरोप घेताना पुन्हा पुन्हा पाहणं... सर्व कसं हृदयात साठवून ठेवणारं... मनात जपून राहणारं... डोळ्यात बसून राहणारं... फक्त स्वप्नवत...मला तर सारखं वाटायचं मी सोडला तर कुणाची बिशाद होती तुझ्या नजरेला नजर मिळवायची... तरी तुला सांगतो... तू माधुरी दीक्षितसारखी नजरे मिळवलीस की माझा माभ संजय कपूर व्हायचा राजा सिनेमातल्यासारखा... पण तुझ्या नजरेसमोर माझी जिगर असायची हे विसरू नको हं...मला प्रेमात पाडणारी तुझी नजर मात्र शामल नव्हती...ती वीज तुझ्या नजरेमधली...जीवाला वेड लावणारी... प्रेमात पाडणारी... आजन्म नजरेत ठेवणारी.... शेवटी एकच म्हणावसं वाटतं की, ती वीज तुझ्या नजरेमधली...अन् गालावर माझ्या खुलली खळी....
तुझाच नजरकैदी,
प्रेयस